देवेंद्र फडणविसांचे स्वगत...
- (कुसुमाग्रजांची माफी मागून)
धरावं की सोडावं ?
हा एकच सवाल आहे.
या सत्तेच्या फडावर
बेभरवश्या बारामतीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे सत्तेची लक्तरे
त्यात गुंडाळलेल्या स्वप्नांच्या यातनेसह
राष्ट्रपती राजवटीच्या अनिश्चित भविष्यामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट
एका प्रहाराने
माझा, दादांचा आणि उध्दवरावांचाही.
पावसातल्या सभेने
नियोजनाला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या निकालाला
नसावा काहीच आधार!!!!
पण त्या निकालालाही पुन्हा
स्वप्न पडू लागलं तर
तर-तर
इथचं मेख आहे.
नव्या आव्हानांचा अनिश्चित कारभारात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो
हे जुने जागेपण
सहन करतो मित्राच्या धोक्याला निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे अत्याचार
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची विटंबना
आणि अखेर मतपेटीचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेने
आमच्याच मतदाराच्या दाराशी.
मतदारा , तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांना साथ दिली
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला ,
ज्यानं आम्हाला सत्तेच्या जवळ नेलं
तो तूही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या पक्षांचे हे सरकार बघून
हे मतदारा ,
आम्ही लोकांनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या - पायावर- कोणाच्या-
- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१६०७२०२०
No comments:
Post a Comment