भारतीय उपखंडातला विश्वचषक नुकताच संपला होता. १९९६च्या जून च्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड च्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यावर तीन नवख्या चेहऱ्यांनी कर्णधार अझरुद्दीन च्या नेतृत्वाखाली पदार्पण केलं. वेंकटेश प्रसाद, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड...
लॉर्ड्स च्या कसोटीत गांगुली आणि द्रविड दोघांनाही संधी मिळाली. गांगुलीने शतक ठोकून कसोटी कारकिर्दीला धडाक्यात सुरुवात केली. आणि वर्तमानपत्रांची जागा व्यापली. त्याच डावात द्रविड नेही 95 धावा केल्या होत्या. मात्र त्या गांगुलीच्या शतकापुढे काहीश्या झाकोळल्या गेल्या. त्या पदर्पणापासून जो त्याचा मागे प्रसिद्धी पासून लांब राहण्याचा शाप मिळाला तो कारकीर्द संपेपर्यंत तसाच राहिला.
तंत्रशुद्ध फलंदाजी, संघभावनेतून आलेली त्यागाची वृत्ती आणि आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव ठेऊन यशाची एक एक वीट रचत घडवलेली उत्तुंग कारकीर्द...
१९९६ साली पदार्पण करताना भारतीय संघात बरेच स्ट्रोक मेकर अजून खेळत होते त्या संघात सचिनचा मास्टरक्लास, सिद्धू ची बेफिकीर आणि गोलंदाजांवर तुटून पडणारी शैली, अझरची मनगटी नजाकत आणि जडेजा चा फिनिशिंग टच असं असताना संघात जागा मिळवणं आणि तिथं आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करणं हे महाकठीण काम होतं. पण म्हणतात ना एकाचं नुकसान दुसऱ्याचा लाभ... सिद्धू ला त्याचा स्वभावाप्रमाणे अचानक झटका आल्या सारखा अर्धवट दौरा सोडून घरी परतण्याची दुर्बुद्धी का सुचावी आणि त्यातूनच गांगुली आणि द्रविड ला संधी मिळावी आणि त्यांनी त्याच सोनं करावं सगळं एखाद्या स्क्रिप्ट सारखं वाटतं.
त्या लोर्ड्स वर एक "ऑनर्स बोर्ड" आहे. तिथं खेळलेल्या कसोटीत डावात पाच बळी मिळवणारे आणि शतक ठोकणारे यांची नावे त्या बोर्डावर लिहितात. पदर्पणात ती संधी गांगुलीने साधली. मात्र त्याच्याबरोबरच कारकीर्द सुरू करणाऱ्या द्रविड च्या कारकिर्दीत तो क्षण १५ वर्षांनी २०११साली आला.
राहुल द्रविड ने संघासाठी हरतऱ्हेचा त्याग केला २००० साली गांगुलीच्या नेतृत्वाखाली मॅच फिक्सिंग नंतर जो संघ उभा राहिला त्यात द्रविड चा त्याग महत्त्वपूर्ण ठरला. एकदिवसीय संघात ७ फलंदाज ४ गोलंदाज घेऊन खेळण्याची गांगुलीची रणनीती केवळ आणि केवळ द्रविड मुळे शक्य झाली कारण तो त्याच्या इच्छेविरुद्ध केवळ संघाची गरज म्हणून फलंदाज यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास तयार झाला.
२००१-२००८ या काळात भारतीय क्रिकेटच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये फॅब फाईव्ह चा बोलबाला होता त्यात सेहवाग ची आक्रमकता, सचिनचा मास्टरक्लास, गांगुलीची ऑफ साईडची हुकूमत, लक्ष्मणची मनगटी फटाक्यांचे सौन्दर्य आणि या सगळ्यांना एक भक्कम आधार देणारी भिंत म्हणजे राहूल द्रविड.
द्रविडने कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांना डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ केला १९९९ ची डुनेडीन कसोटी पासून २००१ ची कोलकाता,२००२ चे जॉर्जटाऊन,हेडिंगले, नॉटिंगम, ओव्हल २००३ चे अडलेड, २००४ चे रावळपिंडी, या त्याच्या प्राईम मधल्या खेळी डोळ्यासमोर अजूनही तरळतात.
आपल्या खेळाशी कायम एकनिष्ठ राहिला, दुसऱ्या कोणाचाही स्वतःवर कधीही द्रविड ने प्रभाव पडू दिला नाही. त्याच्या अवतीभवती एका पेक्षा एक स्ट्रोकमेकर असताना हा मात्र संयम, चिकाटी आणि दृढ निश्चयाचा मूर्तिमंत प्रतीक ठरला. कधीही गोलंदाजाच्या आमिषाला बळी न पडता त्याला जेरीस आणून खराब चेंडू वर हल्ला करण्याची त्याची शैली ही भारतीय क्रिकेटची ओळख बनली. संघ अडचणीत असताना नांगर टाकणारा द्रविडच...
२००४ साली सुरू झालेल्या आयसीसी पुरस्कारांमध्ये पहिली सर गारफील्ड सोबर्स वर्षातील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी द्रविडलाच मिळाली.. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये भारतीय संघाने मालिका विजय साजरा केला. पण म्हणतात ना हर किसीको मुक्कमल जहाँ नहीं मिलता द्रविडचं तसंच झालं कारकिर्दीत ३ विश्वचषक खेळला एकदा फायनलला ही पोहोचला मात्र ते विश्वचषकाच कोंदण काही त्याला खेळाडू म्हणून लाभलं नाही ते पूर्ण झालं ते २०१८ साली प्रशिक्षक
म्हणून...
वयाचा ४८ व्या वर्षात पदार्पण करताना त्याच्याबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे.
असो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्याचे शिष्य अंडर १९ च्या विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी ही शुभेच्छा!!!💐💐💐
-🖋️ Harshad Mohan Chaphalkar